
यवतमाळ, दि.३० : सध्या खरीप हंगामाची सुरवात झालेली आहे. पेरणीचे कामकाज सुध्दा आटोपत आले असून लवकरच शेतीपिकांवर किटकनाशकांची फवारणी सुध्दा होईल. शेतकरी, शेतमजुर यांना किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे होणाऱ्या विषबाधेवर नियंत्रण ठेवण्याकरीता सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती अभियान राबवीण्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी निर्देशीत केले आहे.
सदर जनजागृती अभियान राबविण्याकरीता तालुका व ग्राम स्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. तालुका स्तरीय समितीची स्थापना तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असून तालुका कृषी अधिकारी हे सदस्य सचिव राहणार आहेत. संबंधीत तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी हे समिती सदस्य राहणार आहेत. तर ग्रामस्तरीय समिती सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली स्थापीत करण्यात आली असून कृषी सहाय्यक हे सदस्य सचिव राहतील. तसेच तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील व आशा वर्कर हे सदस्य राहतील.
समितीमार्फत गावातील फवारणी करणाऱ्या शेतमजुरांना मागणीनुसार संरक्षक किट वाटप करण्यात येईल. विषबाधा जनजागृती अभियान अंतर्गत सुरक्षीत फवारणी कशी करावी याबाबत सोशल डिस्टसींगचे नियम पाळुन प्रचार व प्रसिध्दी केल्या जाईल. तसेच कृषि अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त याद्यांप्रमाणे किटकनाशक फवारणी करणारे शेतकरी, शेतमजुर याच्या आरोग्य तपासणी करीता कॅम्पचे आयोजन करण्यात येईल. लाल रंगाच्या त्रिकोण असलेल्या किटकनाशकांऐवजी पर्यायी किटकनाशक वापरण्याकरिता शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, संरक्षक किट न वापरता फवारणी करतांना आढळुन आल्यास शेतकऱ्यांना समज देऊन दुष्परिणामाची जाणीव करुन देण्याचे कामही समितीतर्फे करण्यात येणार आहे.
तसेच शेतकऱ्यांना सूचना करतांना फवारणीच्या अगोदर स्वच्छ आंघोळ करणे, पोटभर न्याहरी करणे, फवारणी दरम्यान बिडी, सिगरेट, तंबाखु, खर्रा, दारु अशा मादक पदार्थाचे सेवन कटाक्षाने टाळावे. फवारणीचे कामकाज आटोपल्यावर साबनाने स्वछ आंघोळ करून नंतरच जेवन करावे. फवारणी ही वाऱ्याच्या दिशेने करावी जेणे करुन स्प्रे पंपातुन उडणारे तुषारकण अंगावर उडणार नाही. फवारणीचे कामकाज हे सकाळी अथवा दुपारनंतर उतरत्या उन्हाच्या वेळी करावे. शक्यतो दुपारच्या कडक उन्हात फवारणीचे कामकाज टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गावामध्ये विषबाधा होताच बाधितास वाहनाद्वारे रुग्णालयामध्ये तात्काळ उपचराकरीता दाखल करणे, विषबधा झालेल्या व्यक्तीने कोणकोणते किटकनाशकांची किती प्रमाणात फवारणी केली याची माहीती त्वरीत वैद्यकीय अधिकाऱ्यास दयावी याबाबत समितीस सूचित करण्यात आले आहे. कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषीकेंद्र धारक यांनादेखील जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता