गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमारेषेवर कुणीही विना पास आत येऊ नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तरीही नागरिक  पास नसतानाही जिल्ह्यात प्रवेश करत आहेत, यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रादूर्भाव कमी करण्यासाठी कुणीही विना पास प्रवेश करणार नाही यासाठी पोलीस आणि महसूल यंत्रणेनी  काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रवेश होणाऱ्या प्रत्येक नाक्यावर सी.सी.टीव्ही कॅमेरे लावावेत,  अशा सूचना करुन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पुढे म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे विनाकारण गाडीवरुन फिरणाऱ्यावर कारवाई करावी. पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा वापर अधिक  कडक अंमलबजावणीसाठी करावा. कुणीही विना पास जिल्ह्यात प्रवेश करणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांनी शेवटी केल्या.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता