बुलडाणा, दि. 10 : मागील अर्थसंकल्पामध्ये महिला व बालविकास विभागाला वेगळा निधी देण्यात आला. तसेच पूर्वी देण्यात येत असलेलया निधीमध्ये वाढ करण्यात आली. महिला व बालविकास विभाग हा महत्त्वपूर्ण विभाग असून महिलांचे सक्षमीकरणाचे काम या विभागातून होते. विभागाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला व बालविकास विभागाच्या योजना, उपक्रम यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार राजेश एकडे, जि.प अध्यक्षा  मनिषा पवार, जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवत,  महिला व बालविकास सभापती ज्योती पडघान, समाज कल्याण सभापती पुनम राठोड, कृषि सभापती राजेंद्र पळसकर,  माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन आदी उपस्थित होते.

कोविड आजाराच्या कालावधीत पोषण आहाराचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना करीत मंत्री म्हणाल्या, गरोदर माता, स्तनदा माता, बालके यांचा पोषण आहार व्यवस्थित वितरीत करण्यात यावा. कोविड काळात जन्माला आलेल्या बालकांवर लक्ष ठेवण्यात यावे. त्यांची प्रकृतीची काळजी घ्यावी. नाविण्यपूर्ण योजनेतून अंगणवाड्यांच्या मजबूतीकरणाची कार्यवाही करावी. या वर्षात कोविडमुळे प्रशिक्षण व अन्य कार्यक्रमांवर खर्च न झालेला निधी दुसऱ्या बाबीवर वळता करावा.  अंगणवाडी बांधकाम पूर्णत्वास आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. भाडे तत्त्वावरील अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

त्या म्हणाल्या, जिल्ह्यात जळगांव जामोद  तालुक्यातील संपूर्ण आदिवासी असलेल्या गावांमध्ये अंगणवाडी देण्यात यावी. त्याठिकाणी वन विभागाला प्रस्ताव देवून अंगणवाडीकरीता जागा उपलब्ध करून घ्यावी. जिल्हा नियोजन समितीमधून महिला व बालविकास विभागाला 1 कोटी रूपये मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बरेच प्रश्न यामधून सुटणार आहे. बुलडाणा शहरात ताराबाई शिंदे यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करावा. अंगणवाड्यांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठ्याची सुविधा निर्माण करण्यात यावी. जिल्हास्तरावर महिला व बालविकास विभागाच्या सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी महिला व बालविकास भवन निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी कार्यवाही करावी. अंगणवाडी सेविकांना कोविड काळातील विम्याचा लाभ देण्यात यावा. त्यांचे मानधन वाढविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. तसेच त्यांचे मानधन नियमित स्तरावर आणण्यात येणार आहे. महिला आयोगाचे कार्यालय विभाग व नंतर जिल्हा स्तरावर आणण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना निश्चितच जलद न्याय मिळेल. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, श्री. रामरामे, श्रीमती आस्वार आदी उपस्थित होते.

यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ, एकात्मिक नागरी बालविकास प्रकल्प, वन स्टॉप सेंटर, कन्या माझी भाग्यश्री योजना आदींचाही आढावा घेण्यात आला. दरम्यान महिला आर्थिक विकास महामंडळातंर्गत तेजश्री फायन्साशियल योजनेतंर्गत दे. मही, जळगांव जामोद व उंद्री या लोकसंचालीत साधन केंद्रांना वितरीत निधीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे महिला बचत गटांना देण्यात येणाऱ्या माविमच्या योजनेमधून ट्रॅक्टरचे वितरणही करण्यात आले. यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याहस्ते लाभार्थी महिलेला देण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे फित कापून उद्घाटन केले. सभागृहाबाहेर माविम अंतर्गत असलेल्या बचत गटामार्फत निर्मित मास्क व कापडी पिशवीच्या स्टॉलला मंत्री महोदयांनी भेट दिली. तसेच याप्रसंगी त्यांच्या हस्ते जिल्हा परिषद आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोविड नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करावी

कोरोना संसर्गाला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन उत्तम रित्या काम करीत आहे. भविष्याचा वेध घेऊन प्रशासनाने समन्वय ठेवून आणखी प्रभावी काम करावे. कोविड संकटात संधी शोधून आपली आरोग्य यंत्रणा सक्षम करून घ्यावी. ग्रामीण रूग्णालयापर्यंत व्हेंटीलेटरची सुविधा द्यावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड आजाराबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार राजेश एकडे, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्षा कमलताई बुधवत, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.

बुलडाणा येथे लवकरच कोरोना तपासणी प्रयोगशाळा होत असल्याचे सांगत मंत्री म्हणाल्या, यामुळे जिल्ह्यातील तपासण्या जलद होतील. त्याचा लाभ होईल. विलकीकरण कक्षात ठेवलेल्या संशयित व्यक्तींना चांगल्या सुविधा द्याव्यात. नागरिकांमध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे, गर्दी न करणे आदी बाबींची सवय लागत आहे. ही सवय पुढे अशीच राहण्यासाठी प्रशासनाने काम करावे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांमध्ये आणखी जनजागृती करावी. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी बैठकीत सादरीकरण केले.

यावेळी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आदींकडून कोविड नियंत्रणाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता