नागपूर, दि. 30 :  जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काल 25 गावाला पुराचा विळखा पडला होता. आज सकाळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांच्यासह पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणीदरम्यान तालुक्यात पुराने जनजीवन विस्कळीत झाले असून पिकांची मोठी हानी झाल्याचे दिसून आले. पूरग्रस्त कुटुंबाच्या झालेल्या नुकसानीचे   तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश  संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

खापरखेडा तालुक्यातील बीणानदीमुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे, पारशिवणी तालुक्यातील सिंगारदीप या नदीतील पुराच्या पाण्यामुळे शेतातील पिकांची हानी झालेली आहे तसेच मौदा तालुक्यातील कन्हान नदीला आलेल्या पुरात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मौदा तालुक्यातील 18 गावे पुरामुळे बाधित झाले असून  1158 कुटुंबांना याचा फटका बसला आहे. साधारणत 6186 हेक्टर अंदाजे शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मौदा तहसिलदार प्रशांत सांगाडे यांनी यावेळी पालकमंत्र्यांना  दिली.

पालकमंत्री नितीन राऊत यांनी पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांची विचारणा करून त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती, घरे व संसारपयोगी वस्तू यांचे तातडीने पंचनामे करुन प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.

 


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता