
अमरावती, दि.22: जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना पतपुरवठ्यासाठी 100 कोटी रुपयांपर्यंत निधीची तयारी जिल्हा सहकारी बँकेने दर्शवली आहे. त्यानुसार महिला विकास आर्थिक महामंडळाकडून महिला बचत गटांना उद्योग, व्यवसायासाठी पतपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबतचे आवश्यक सामंजस्य करार, कार्यप्रणाली आदी प्रक्रिया होत असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज धामणगाव काटपूर येथे दिली. मोर्शी तालुक्यातील धामणगाव काटपूर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, दिशा प्रकल्प व माहेर लोकसंचालित साधन केंद्रातर्फे आयोजित स्वयंसहायता समूहांच्या प्रगतीचा आढावा व व्यापार सखींशी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, माजी सरपंच रेखाताई वानखडे, अर्चना खांडेकर यांच्यासह विविध समूहांच्या महिला सदस्य व गावकरी यावेळी उपस्थित होते.
कायमस्वरूपी रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी माविमच्या बचत गटांना दहा लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, अमरावती जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्याने बचत गटांना पतपुरवठ्यासाठी शंभर कोटी रुपये निधीची योजना आकारास येत आहे. त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असा उपक्रम राबविण्यात येईल.
महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल
स्वयंसहायता समूहांना बळ देऊन महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबात महिला ही कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचाही आधार असते. त्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी नवनवीन उपक्रम व योजना हाती घेण्यात आल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बळकटीकरणासाठीही नियोजन होत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
गोट बँकेचाही उपक्रम
दिशा प्रोजेक्टच्या माध्यमातून विविध यशोगाथा समोर येत आहेत. अनेक महिला भगिनींनी स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायाची कास धरत शून्यातून विश्व निर्माण केले आहे. तारखेडा येथील गोट फार्मअंतर्गत गरजूंना शेळीवाटपाचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार गरजूंना फार्मकडून एक शेळी देण्यात येईल. तिच्या संगोपनानंतर संबंधित लाभार्थ्याने शेळीचे एक पिल्लू फार्मला परत करायचे आहे. त्यासाठी गोट बँकही तयार करण्यात येत असून, पशुसखींमार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. युएनडीपी (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम)कडूनही चांगले कार्यक्रम राबविण्यात आले. त्यांच्यासोबत पुढील करार आदी प्रक्रिया पार पडल्यावर धान्य खरेदी-विक्रीसाठी अडत व्यवसायाचाही समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पात जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात सहा हजार 200 बचत गट असून, 68 हजार महिलांना संघटित करण्यात आले आहे. मूल्यसाखळी निर्माण करून पीक उत्पादकता वाढविण्यासाठी व शेतकरी बांधवाना बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती श्री. सोसे यांनी दिली.
व्यापारसखींशी संवाद
महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी स्वयंसहायता समूहांच्या सदस्यांशी दिलखुलास संवाद साधला. कोरोना संकटकाळात विविध उपायांची अंमलबजावणी होत असताना विकासाची प्रक्रिया थांबलेली नाही. महिला सक्षमीकरणासाठीही भरीव योजना व उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
एकजुटीतून अवतरेल समृद्धीची नवप्रभा
‘एकजुटीतून अवतरेल समृद्धीची नवप्रभा’ असे ब्रीद घेऊन चालणा-या महामंडळाच्या या योजनेतील सहभागी सदस्यांच्या यशोगाथा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरल्या. दिशा प्रकल्पातील यशस्वितांनी यशोगाथा व अनुभवकथन यावेळी केले. स्टेशनरी, गारमेंट्स, पीठ गिरणी, अडत आदी व्यवसायांची उभारणी व त्याद्वारे आर्थिक सक्षमता याबाबत या भगिनींनी अनुभवकथन केले.या प्रकल्पाद्वारे प्रशिक्षण व व्यवसायाची संधी मिळून रोजगार मिळाला. त्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळाले. त्याचप्रमाणे, आर्थिक स्वावलंबन व आत्मविश्वास मिळाला. घराबाहेर न पडलेल्या भगिनींना या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबनाचे आकाश खुले झाले, अशा प्रतिक्रिया या भगिनींनी व्यक्त केल्या.
प्रकल्पाद्वारे अर्थसाह्याच्या धनादेशाचे वितरणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. गुलाबी बोंडअळी जनजागृती मोहिमेच्या कृषीरथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ कार्यक्रम, तसेच वृक्षारोपण कार्यक्रम पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी झाला. श्रीमती खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश घार यांनी आभार मानले.
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता