कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्याकडून ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील सुमारे 35 लाख शेतकऱ्यांसाठी अत्यंत गोड बातमी देण्यात आली आहे. पीक विमा कंपन्यांनी सुमारे 1700 कोटी रुपये पीकविमा (Crop Insurance) पहिल्या टप्प्यात अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर विमा रक्कमा थेट वितरण करण्यास सुरुवात करण्यात येणार असून बऱ्याच ठिकाणी दिवाळी (Diwali 2023) आधीच पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
Farmers Crop Insurance Diwali 2023

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वेगवेगळ्या जिल्ह्यात खरीप हंगामात हवामानाच्या असमतोलामुळे नुकसान झाले होते. राज्यातील तब्बल 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे.  

विविध जिल्हा प्रशासनाने अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत 25% अग्रीम पीकविमा देण्याबाबत संबंधित पीकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करत आदेश देण्यात आले होते. विभागीय आणि राज्य स्तरावर अपील बहुतांश कंपन्यानी केलेले होते. अपिलांच्या सुनावण्यानंतर संबंधित विमा कंपन्यानी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केलं असून अपिलांचे निकाल येतील तसे विम्याची अग्रीम रक्कम आणि शेतकरी लाभार्थी संख्या यांच्यात मोठी वाढ होणार आहे.

राज्यातील सर्व प्रमुख पीकविमा कंपन्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली धनंजय मुंडे यांनी बैठक घेत अग्रीमचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याबाबत विनंती केली होती. संबंधित पीकविमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबंधितांना निर्देश दिले होते. -  
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही विम्याबाबत आग्रही होते. धनंजय मुंडे यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत 

किती पीकविमा कोणत्या जिल्ह्यात मंजूर? 



+ जळगाव - 16,921 (रक्कम - 4 कोटी 88 लाख)
+ नाशिक - शेतकरी लाभार्थी - 3 लाख 50 हजार (रक्कम - 155.74 कोटी)
+ सोलापूर - 1,82,534 (रक्कम - 111 कोटी 41 लाख)
+ अहमदनगर - 2,31,831 (रक्कम - 160 कोटी 28 लाख)
+ बीड - 7,70,574 (रक्कम - 241 कोटी 21 लाख)
+ सातारा - 40,406 (रक्कम - 6 कोटी 74 लाख)
+ सांगली - 98,372 (रक्कम - 22 कोटी 4 लाख)
+ धाराशिव - 4,98,720 (रक्कम - 218 कोटी 85 लाख)
+ बुलडाणा - 36,358 (रक्कम - 18 कोटी 39 लाख) 
+ अकोला - 1,77,253 (रक्कम - 97 कोटी 29 लाख)
+ जालना - 3,70,625 (रक्कम - 160 कोटी 48 लाख)
+ अमरावती - 10,265 (रक्कम - 8 लाख) 
+ कोल्हापूर - 228 (रक्कम - 13 लाख)
+ परभणी - 4,41,970 (रक्कम - 206 कोटी 11 लाख)
+ लातूर - 2,19,535 (रक्कम - 244 कोटी 87 लाख) 
+ नागपूर - 63,422 (रक्कम - 52 कोटी 21 लाख)

एकूण - लाभार्थी शेतकरी संख्या - 35,08,303 (मंजूर रक्कम - 1700 कोटी 73 लाख)